Sunday, October 16, 2011

५१. विवाह!

विषयप्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करतो, विवाह हा मानवी जीवनातला अप्रतिम संस्कार आहे. विवाह ही निव्वळ कल्पना आहे हे मी निर्विवादपणे मांडणार असलो तरी कल्पना अफलातून आहे. लग्नाशिवाय मानवी मुलाचं योग्य संगोपन अशक्य आहे, स्वयंपूर्ण व्हायला निसर्गात सर्वाधिक कालावधी लागणारं माणसाचं मूल कुटुंबाशिवाय आयुष्यात उभंच राहू शकणार नाही. अयोग्य संगोपनातून असह्य व्यक्तीगत आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि त्याला पाश्चिमात्यांच्या जीवनाचा उडालेला बोजवारा साक्षी आहे. लग्न या संस्काराबद्दल मला नितांत आदर आहे.

खुद्द ओशो आणि असे अनेक विचारवंत जरी लग्नाच्या कितीही विरोधात असले आणि तो सोहळा अनैसर्गिक मानत असले तरी माझ्या मते मानवी आयुष्याचा जन्म ते मृत्यू असा समग्र विचार केल्यानंतर विवाहविरोधी विचारांशी मी संपूर्ण असहमती दर्शवतो.

विवाहाचा संस्कार कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक प्रगतीत अडसर नाही आणि तो भौतिक जीवन सुखद करतो फक्त ते नातं, त्या संबंधातली खुमारी कळायला हवी. ज्यांनी म्हणून अध्यात्मात संसार अडथळा मानलाय त्यांना संसारही जमला नाहीये आणि अध्यात्मही नाही हे मी आज दोन्ही सार्थ करून नि:संशयपणे सांगू शकतो.

या लेखनाचे दोन हेतू आहेत, एक म्हणजे तुम्हा सर्वांना उपयोग व्हावा, या अफलातून नात्याची मजा यावी म्हणून मी माझा व्यक्तीगत अनुभव तुमच्याशी शेअर करतोय आणि दोन, विवाहेच्छुक जे लिव्ह-इनची तकलादू स्वप्न बघतायत आणि मल्टीपल रिलेशन्सच्या मृगजळामागे धावतायत त्यांना वस्तुस्थितीची कल्पना यावी.

तुमच्या सध्याच्या वैवाहिक संबंधात मजा यावी हा माझा अत्यंत प्रार्थमिक हेतू आहे, सेपरेशन ही अत्यंत असह्य गोष्ट आहे आणि एकदा सवय लागली की मग जी धरसोड वृत्ती तयार होते त्यातनं स्वास्थ्य असंभव आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या धारणा, आतापर्यंतची त्या संबंधातली वाटचाल, तुमचे एकमेकांविषयीचे समज संपूर्णपणे बाजूला ठेवून ज्या प्रामाणिकपणे मी हा लेख लिहिलाय तितक्याच प्रामाणिकपणे हा रंग तुमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा अशी आशा आहे... आणि जर हा रंग तुमच्या जीवनात आधीच असेल तर तो इतरांशी शेअर करून या विषयाची विधायकता वृद्धींगत करावी अशी इच्छा आहे.
_________________________________

पहिली गोष्ट, पारस्परिक आकर्षण हा विवाहाचा प्रमुख पैलू आहे. हे आकर्षण काय आहे याची कारणमीमांसा होऊ शकत नाही. ते दैहिक आहे, मानसिक आहे आणि भावनिकही आहे आणि त्यात फक्त एकच गोष्ट नक्कीये की ती ‘संपूर्ण व्यक्ती’ आपल्याला प्रिय आहे! खरं तर आपण एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते हे मुद्देसूदपणे आपण सांगू शकलो तर ती व्यक्ती केव्हाही न आवडायला लागण्याची शक्यता आहे. हे विश्लेषण न करता येणारं आकर्षण विवाहाचा केंद्रबिंदू आहे.

तुम्ही जर वैचारिक विवाह केला असेल तर वैवाहिक संबंधाची मजा येण्याची शक्यता कमीये कारण तुम्ही कॅलक्युलेटेड डिसीजन घेतलाय, दोघांच्या व्यक्तिमत्त्वातली दरी दूर करणं जरा मुष्किल आहे. अर्थात याला पण उत्तर असेल पण हा पैलू मी तुमचे प्रतिसाद बघून मग त्यावर उत्तर म्हणून लिहीन.

तर सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमची पत्नी किंवा पती पूर्णपणे स्वीकृत असायला हवी आणि त्या स्वीकृतीचं तुमच्याकडे काहीही कारण नको. हा पूर्णपणे हृदयानं घेतलेला निर्णय हवा, बुद्धीनं नाही, त्यात कोणतीही कारणमीमांसा नको. तुम्ही स्वतःला:ला पूर्णपणे डावावर लावून खेळलेला तो जुगार हवा, इट हॅज टू बी अ मॅडनेस ऑफ अ पर्सन ऑफ मॅच्युरिटी!
काय असेल या पूर्ण स्वीकृतीचं कारण? तर एकच, की त्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला नेहमी सुखद वाटतो, यू आर ऍबसोल्यूटली कंफर्टेबल इन इच अदर्स कंपनी. तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांबरोबर असता तेव्हा तुमच्या दोघांचं मिळून एक वेगळं जग तयार झालेलं असतं. सर्व वैवाहिक जीवनाची खुमारी या ‘निर्भार सहवासाच्या’ सुखात आहे. एका अर्थानं तुम्हाला ती आपल्या बरोबर आहे हे जाणवत देखील नाही आणि एका अर्थानं तुमचा आनंद शेअर करायला तुम्ही जर जगातली कोणतीही व्यक्ती निवडायची म्हटली तर पहिला पर्याय निर्विवादपणे तुमची पत्नी असते!
______________________________________

विवाहाला अत्यंत थोर आध्यात्मिक परिमाण आहे. महावीरानं म्हटलंय ‘एनलाइटन्मेंट इज दि अल्टिमेट अनफोल्डमेंट ऑफ सेल्फ! ’ स्वतः:ला पूर्णपणे उघडणं म्हणजे साक्षात्कार! माझ्या अनुभवानं तुमची पत्नी किंवा पती हे या अनफोल्डमेंटचं द्वार आहे, तुम्ही एकमेकांप्रती दैहिक, मानसिक आणि भावनिक तिन्ही अंगांनी निर्वस्त्र होऊ शकता.

काय असावं महावीराच्या या अफलातून व्याखेचं रहस्य? ते असंय की तुम्ही स्वतः:ला संपूर्णपणे उघडलंत, ते साहस केलंत तर तुमच्या लक्षात येतं, अरे! आत कुणीच नव्हतं; न तिच्या, न तुमच्या! तुम्ही आकाश होता आणि ही संधी तुम्हा दोघांना समप्रमाणात असते. जगातल्या प्रत्येक वैवाहिक दु:खाचं फक्त एकच कारण आहे, स्वतः:ला स्वतः:च्या पती किंवा पत्नीपासनं लपवणं! मग त्या नात्यातली खुमारी संपते, तो सहवास ओझं होतो, माणूस सुखाचा वेध घराबाहेर घ्यायला लागतो. जीवनाची दिशाच बदलते, अनावश्यक कार्यमग्नता, वारसा असेल तर किंवा तशी सभोवतालची मंडळी असतील तर राजकारण, कधी व्यसनाधीनता तर कुठे विवाहेतर संबंध आणि अगदीच काही नसेल तर आनंदासाठी चुकीचा आध्यात्मिक प्रवास असं आयुष्य होतं. एकमेकांच्या सहवासाचा आनंद जो घरातल्या घरात सौख्य निर्माण करू शकला असता, तो हुकतो.

परस्परांशी ट्यूनिंग जमलेलं जोडपं आणि एक सुरेख संगोपन केलेलं मूल, असं कुटुंब सृजनात्मक जगण्याचे अनेक विकल्प निर्माण करू शकतं. इतकंच नाही तर अशा कुटुंबातून, सर्वांची काळजी घेणारं एकत्रित कुटुंब, संपन्नता आणि वैश्विक शांततेची शक्यता निर्माण होऊ शकते हा माझा आशावाद आहे.
______________________________

आता खुद्द वैवाहिक जीवन काय आहे ते पाहू.

वैवाहिक संबंध ही केवळ पारस्परिक मान्यता आहे या एका बोधासरशी त्या नात्यातलं ओझं संपतं! नाऊ ट्राय टू अंडरस्टॅंड, हे एकदम महत्त्वाचंय, एखादी गोष्ट कल्पना आहे हा बोध सुज्ञ व्यक्तीला दोन पर्याय उपलब्ध करतो. एकतर तो ती गोष्ट अत्यंत सहजपणे पेलू शकतो कारण ती त्याच्या आयुष्याचा अनिवार्य आणि असह्य भाग आहे या भ्रमामुळे त्याला ती जड झालेली असते; ते ओझं उतरून जातं!

वेळ ही वास्तविकता नसून पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होणारा भास आहे हे समजता क्षणी आपण वेळेचं ओझं सहज पेलू शकतो, वेळेचं टेन्शन राहत नाही, अगदी तसं!

आणि दुसरी गोष्ट या हलकेपणातून तो त्या नात्याप्रती जास्त जवाबदार होतो, त्याची आपुलकी वाढते!
हे थोडं विरोधाभासी वाटेल पण वेळेचं ओझं नाहीसं झाल्यावर तुम्ही जास्त वक्तशीर होता, तुमची कामं वेळेपूर्वीच संपायला लागतात! कारण वेळेचा धसका संपल्यानं उपलब्ध झालेली एनर्जी युनीडायरेक्शनल होऊन कामाकडे लागते! हे देखील तसंच आहे, संसार हलका झाल्यानं तो पेलायला व्यक्ती अधिक सक्षम होते. यू बिकम मोर एफिशियंट इन हँडलींग द रिलेशनशिप! आणि त्या नात्यात मजा येऊ लागल्यानं तुम्ही जास्त जवाबदारीनं ते नातं निभावू लागता!
_________________________________

सार्थक प्रणयाचे तीन पैलू आहेत (माझ्या ‘अर्थ, काम आणि मोक्ष’ या लेखात मी या विषयी सविस्तर लिहिलंय म्हणून पुन्हा लिहीत नाही) पण अत्यंत निर्विवादपणे, एकमेकांविषयीच्या आकर्षणातून निर्माण झालेला पारस्परिक अनुबंध, निर्वेध चित्तदशा आणि दुसऱ्याला सुख देण्याची आस या तीन गोष्टींशिवाय तृप्त करणारा प्रणय अशक्य आहे.

मनाविषयीच्या माझ्या अत्यंत सखोल, विस्तृत आणि सर्वांगीण अभ्यासावरून मी सांगतो की सार्थक प्रणयाला विवाह हे एकमेव उत्तर आहे. ती कमिटमेंट, ती ओढ, तो निर्धास्तपणा, एकमेकांविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेतून येणारी ती शेअरींगची उत्कटता दुसऱ्या कोणत्याही संबंधात अशक्य आहे.

कुणीही विवाहेतर संबंधाबद्दल कितीही फुशारकी मारली, चित्रपट आणि सिनेसृष्टीत काहीही चित्तवेधक घटना घडल्या आणि दाखवल्या गेल्या, कुणाही प्रतिभावान लेखकानं काहीही वर्णन केलं तरी तो निव्वळ कल्पना विलास आहे, जे घडलं नाही ते दाखवण्याचा तो प्रयत्न आहे.

आणि त्या ही पुढे जाऊन मी सांगीन की कुणाही राजानं कितीही मोठा जनानखाना ठेवला आणि कितीही आणि कसाही शृंगार केला तरी त्याचा प्रणय सार्थक होणार नाही कारण जोपर्यंत राणी एकुलती एक नाही तोपर्यंत राणीसाठी तो प्रणय तृप्तिदायी नाही आणि जो राणीला तृप्त करत नाही तो प्रणय राजाला कदापिही तृप्त करणार नाही!
सार्थक प्रणय म्हणजे जो दोघांना स्वतः:प्रत आणतो, कमालीचं स्वास्थ्य निर्माण करतो आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचं निरसन झाल्यामुळे जो समाधीचं सुख देतो असा प्रणय!
______________________________

मी जेव्हा मानवी जीवनाच्या जन्म ते मृत्यू अशा समग्रतेनं केलेल्या विचाराला विवाह हे अत्यंत सौख्यदायी उत्तर आहे असं म्हणतो तेव्हा मला दोन गोष्टी अभिप्रेत आहेत. एका परस्परांशी अनुबंध जुळलेल्या जोडप्याच्या सार्थक प्रणयातून जन्मलेलं मूल ही आयुष्याची अत्यंत विधायक सुरुवात आहे. अशा कुटुंबातलं संगोपन हे पुन्हा अहोभाग्य आहे. मृत्यू अनिवार्य आहे पण त्याची तृप्ती, त्याची उत्कटता व्यक्ती किती समाधानानं आणि आनंदात जगली यावर आहे.

तुम्हाला जर आनंदाच्या तिन्ही परिमाणांची (दैहिक म्हणजे दृक, श्राव्य, गंध, स्वाद आणि स्पर्श, मानसिक म्हणजे चित्ताची प्रसन्नता आणि आध्यात्मिक म्हणजे शून्याचा बोध) उपलब्धी संसारातच झाली तर मृत्यू हा परम आनंदाचा सोहळा आहे कारण जे जे म्हणून जगायला आणि भोगायला हवं होतं ते तुमचं जगून आणि भोगून झालंय. आता ज्या शरीरानं आपण हे भोग भोगले, या प्रकट जगाचा आनंदोत्सव अनुभवला ते शरीर लयाला जाईल आणि आपण शांत झोप आल्यावर तिला अविरोध समर्पित होतो तसं ते मृत्यूच्या हवाली करून निसर्गाच्या या अफलातून बुद्धिमत्तेप्रती कृतज्ञ होऊ.

संजय

Saturday, October 08, 2011

५०. उत्सव!

उत्सव या लेखानं माझ्या लेखमालेची अर्धशताब्दी होतेय. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादांमुळे मला लिहीत राहावंस वाटलं, तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!_________________________________________

विषयात उतरण्यापूर्वी एक सांगावंस वाटतं की तुम्ही लेखनातली तरलता समजून घ्या. मी सत्य वेगळ्या पद्धतीनं मांडतोय, एकदम सोपं, ओघवतं आणि तुम्हाला स्पर्श करेल असं. शब्दांच्या योजनेत मी प्रवाहीपणा आणतोय, साध्या, सोप्या, रोजच्यातल्या शब्दांची निवड केलीये कारण शब्द गौण आहे, अर्थ महत्त्वाचायं, तुम्ही ओपन राहा तुम्हाला मजा येईल.उत्सव हा एक मूड आहे तो तनमनात भिनवावा लागतो. सभोवतालची परिस्थिती तितकिशी साथ देत नाही पण तुम्हाला लावून धरावं लागतं. आपण उत्सवपूर्ण होतो तेव्हा कुणाच्या विरुद्ध नसतो पण जनमानसाची स्थिती दारुण आहे त्यामुळे आनंदी माणूस ऑड वाटतो. लोक ठरवून ठरवून प्रसंग गंभीर करतात, काहीही प्रसंग नसेल तर गंभीर विषय आणि भेदक चर्चा छेडतात आणि तशात तुम्ही मूड लाइट करण्याचा प्रयत्न केलात तर सगळे तुमच्यावर उसळतात पण उत्सव हा सत्याप्रत जाण्याचा मार्गही आहे आणि ती सत्य गवसल्याची अभिव्यक्ती पण आहे, त्यामुळे सेलिब्रेशन काय आहे आणि तो रंग आयुष्यात कसा उतरवायचा हे समजून घेणं एकदम अगत्याचं आहे.
______________________________

मला विचाराल तर जगातल्या सर्व दु:खाचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे ‘जोडलं जाणं’! दॅटस ऑल! द होल ट्रबल इन लाईफ इज जस्ट अ जॉईंट-पेन! सर्व भवताप हा केवळ संधिवात आहे. या एकमेव कारणापलीकडे दु:ख नाही मग ते कोणतंही असो, शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आध्यात्मिक.
शारीरिक दु:खाला जरा तरी वास्तविकता आहे आणि त्या दुःखाला वैद्यकीय इलाज आहे पण मानसिक आणि भावनिक दु:ख निव्वळ जोडामुळे निर्माण झालेलंय आणि कितीही साधना केली आणि जोड सुटला नाही तर त्याची परिणिती दारुण आध्यात्मिक दु:खात आहे.

आता हे अफलातून महत्त्वाचंय, एकदम लक्षपूर्वक वाचा.

कुठायत हे जोडबिंदू? तर तीन ठिकाणी, तीन बिंदूंमुळे आपण जोडले गेल्यासारखे वाटतो. पाठ टेकून एकदम रिलॅक्स्ड बसा, वेळ रात्रीची असेल तर उत्तम, पहिला बिंदू तुमचे ओठ आणि जीभ यांच्या मध्ये आहे, हे शब्दाचं जन्मस्थान आहे. या बिंदूवर तुमचं अवधान केंद्रित करा, तुम्हाला पहिल्यांदा आजूबाजूला काय चाललंय ते स्पष्ट ऐकू यायला लागेल, सगळं अचानक शांत झाल्यासारखं वाटेल.

काय असेल या शांत वाटण्याचं कारण? तर तुम्ही मनाच्या एका फॅकल्टीतून, ‘म्हणजे आत सतत चालू असलेल्या बोलण्यातून’, मुक्त झालात.

आत मध्ये जी सदैव बडबड चालू होती आणि जीनं तुमचं लक्ष संपूर्णपणे वेधून घेतलं होतं ती थांबली. जे बोलणं अनावर झालं होतं, या आयुष्यात कधी थांबणार नाही असं वाटत होतं ते थांबलं.

शांता शेळक्यांनी लिहिलंय :

माझीया मना जरा थांबना
पाऊली तुझ्या या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

ही वेदना संपली, शांतता प्रस्थापित झाली! का थांबला हा अविरत सुरू असलेला लक्षवेधी संवाद? तर तुम्हाला जे वाटत होतं की ‘आपणच बोलतोय’ तो भ्रम संपला, जर आपणच बोलत असू तर थांबवणार कोण? मन बोलत होतं, आपल्याला ऐकू येत होतं पण आपल्याला वाटत होतं आपणच बोलतोय, हा पहिला जोडबिंदू निखळला, तीन पैकी एका परिमाणातून तुम्ही मुक्त झालात!

दुसरा जोडबिंदू कपाळात आहे, कपाळ हा मनाच्या विडीओचा स्क्रीन आहे. जसा ओठ आणि जीभ यात मनाच्या ऑडिओचा माइक आहे तसा त्याचा दुसरा भाग, दृश्य दाखवणारा पडदा, कपाळात आहे. प्रत्येक संवेदनेसरशी कपाळाच्या पडद्यावर तदनुषंगिक दृश्य प्रकट होतंय. ही प्रक्रिया आत्यंतिक वेगानं घडतेय, सरळ प्रसंगच अंत:चक्षू (म्हणजे बंद केलेल्या डोळ्यां) समोर सरकतोय. आणि तुम्ही अत्यंत सावधपणे बघितलंत तर भर दिवसा असे प्रसंग तुमच्या डोळ्यांसमोरून सरकतायत.या दृश्य दर्शवणाऱ्या जोडबिंदूचा वेध अत्यंत साकल्यानं घ्यायला हवा कारण आपली नजर स्थिर नाहीये, ती पटकन दृश्यात गुंतून जाते आणि आपण मन:चक्षूं समोर चाललेल्या प्रसंगात हरवून जातो, इतके की आपल्याला वाटतं खरंच तो प्रसंग घडतोय, आपल्याला वास्तवाचा, सद्य स्थितीचा संपूर्ण विसर पडतो. कोणतीही संवेदना झाल्या क्षणी तुम्ही सावध व्हा आणि ज्या क्षणी तुम्हाला कपाळात प्रकट झालेलं दृश्य दिसेल त्या क्षणी तुम्ही दुसऱ्या जोडबिंदू पासून मुक्त झालेले असाल, वर्तमानात आलेले असाल, आयुष्यात पहिल्यांदा संपूर्ण शरीराचा एकसंध बोध तुम्हाला होईल, तुम्ही शरीरापासून वेगळे झालेले असाल, विदेह झालेले असाल!

आता हे अत्युच्च आहे, एकदम नीट वाचा. हा दुसरा जोडबिंदू एकदम मजेशीर आहे, या बिंदूमुळे, म्हणजे या बिंदूशी जोडलं गेल्यामुळे आपल्याला दुहेरी भास होत असतो, एक, आपण शरीर आहोत आणि दोन, आपण प्रसंगात सापडलेली व्यक्ती आहोत! अँड माइंड यू, हा भास एकदा नाही, दोनदा नाही तर सतत होत असतो. जागेपणी तर होतच असतो पण स्वप्नात सुद्धा होतो, आपण सदैव दृश्यानं घेरल्यासारखे वाटतो.

ईलही जमादारच्या ओळी आहेत:

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलही
दाही दिशा कशाच्या,
हा पिंजरा असावा

अशी आपली स्थिती झाल्यासारखी वाटते, कुठेही जा सुटका नाही पण हा बिंदू गवसता क्षणी तुम्ही एकदम मोकळे होता, तरल होता, आकाश होता. काय कारण असेल या मुक्ततेचं? या हलकं वाटण्याचं? तर आपण निराकार आहोत, केवळ या दृश्य दर्शवणाऱ्या जोडबिंदूनी आपलं लक्ष सतत वेधून घेतल्यानं आपल्याला आपण आकार झाल्याचा भास होत होता, तो भास संपला म्हणून ही तरलता आहे, आपण निर्भार झालेलो आहोत.

संपूर्ण शरीराची जाणीव हा तिसरा जोडबिंदू आहे, पहिल्या दोन जोडबिंदूंसारखं त्याचं ठराविक स्थान नाहीये, इट इज अ ‘फिल’!. हे जरा समजून घेण्यासारखं आहे, एकदम नजाकतीचं आहे, लक्षपूर्वक वाचा.

तुम्ही कधी गाणं म्हणत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला संगीताची शास्त्रीय माहिती काहीही नसली (म्हणजे लय, ताल, स्वर, सम) तरी गाणं चुकलंय हे लगेच लक्षात येतं. काय असेल याचं कारण? त्याचं कारण असंय की स्वर, लय, ताल आणि सम हे सगळं मिळून एक फिल आहे. तुम्हाला लय सांगता येईल, स्वर गाऊन दाखवता येईल, ताल हातानं धरता येईल, सम थोड्या प्रयत्नानं समजेल पण हा फिल जाम दाखवता येणार नाही कारण हा फिल म्हणजे खुद्द आपण आहोत! लय, ताल, स्वर, सम सर्व जाणणारी निराकार जाणीव आहोत, म्हणजे ‘आहोत’ नक्की पण ‘नक्की असे’ कुठे नाही आहोत, किंवा इतके सर्वत्र आहोत की त्यामुळे नक्की कुठे आहोत हे सांगता येत नाहीये.
हा तिसरा जोडबिंदू दोन परिमाणांचा बनलाय, एक म्हणजे आपल्याला संपूर्ण शरीराची जाणीव आहे त्यामुळे आपण कुठे तरी आहोत असं वाटतंय, (थोडक्यात जिथे शरीर आहे तिथे आहोत असं वाटतंय) आणि ‘कुठे तरी आहोत’ म्हणून ‘कुणी तरी’ आहोत असं वाटतंय (म्हणजे व्यक्ती आहोत असं वाटतंय). ज्या क्षणी हा तिसरा जोडबिंदू किंवा हा भार-बिंदू तुमच्या लक्षात येतो, तुमच्या जाणीवेच्या कक्षेत येतो त्या क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त होऊन फक्त एक तरलता होता, एक निर्भार उपस्थिती होता! आपण कुणीही नाही आणि कुठेही नाही अशा अत्यंत तरल स्थितीला तुम्ही येता, आणि तुमच्या जीवनात उत्सव सुरू होतो!

____________________________

उत्सवाला तीन परिमाणं आहेत, ती नुसती लक्षात आली की काम झालं!

पहिलं परिमाण म्हणजे आपण अस्तित्वाशी समरूप आहोत, वी आर वन विथ द एक्झिसटन्स. याची नुसती दखल घ्या, म्हणजे ज्याप्रमाणे इतर सजीव आणि निर्जीवांची काळजी अस्तित्व घेतंय त्याचप्रमाणे आपणही अस्तित्वाच्या छत्रछाये खाली आहोत, आपण इथे उपरे नाही, आपल्याला निराकार अंतर्बाह्य घेरून आहे.

दुसरी महत्त्वाची आणि या एकरूपतेतून येणारी गोष्ट म्हणजे, ज्या बुद्धिमत्तेनं हे अस्तित्व सक्रिय आहे तीच बुद्धिमत्ता आपल्याला देखील क्षणोक्षणी उपलब्ध आहे, काय करावं, कोणती दिशा घ्यावी, काय सुखाचं, सहज आणि आनंदाचं होईल हे जसं पशुपक्ष्यानां समजतंय तसं आपल्यालाही समजू शकतं कारण आपल्या जाणीवेशी अस्तित्वाची बुद्धिमत्ता एकरूप आहे.

तिसरी गोष्ट, आपण आणि अस्तित्व यात कुठेही भेद नाही त्यामुळे आपल्याला मृत्यू नाही कारण अस्तित्व लयाला जाऊ शकत नाही, म्हणजे प्रकट जग ज्याप्रमाणे एखादं शरीर लयाला जातं तसं लयाला जाईल पण ज्यात ते प्रकट झालंय तो निराकार तसाच राहील. आपण अस्तित्वाशी समरूप आहोत म्हणजे निराकाराशी एकसंध आहोत आणि आकारातून प्रकट झालोत त्यामुळे शरीर लयाला जाईल पण आपण तसेच राहू, सध्या आपल्या उपस्थितीला शरीराचं आवरण आहे, मृत्यूनंतर ती उपस्थिती निराकार होईल इतकंच.

या तीन गोष्टी लक्षात आल्या की जीवनात उत्सव सुरू होतो कारण आपण आकारात असूनही आकाराशी जोडलेलो नसतो, कुठेही जोडलेलो नसल्यानं सदैव तरल असतो आणि ही तरलता अस्तित्वागत बुद्धिमत्तेशी संलग्न असल्यानं क्षणोक्षणी नवे स्वच्छंद विकल्प आपल्याला उपलब्ध होतात आणि आपण अस्तित्वासमवेत त्या उत्सवात रंगून जातो.

संजय