Tuesday, February 01, 2011

१४. न्यूनगंड

ओशोंनी असं म्हंटलयं की माणसानी दोन गोष्टी फार दडवून ठेवल्या आहेत, एक म्हणजे प्रणय आणि दुसरी मृत्यु! पहिली गोष्ट जीवनाचं प्रवेशद्वार आहे आणि दुसरी निर्गमनाचं; या दोन द्वारांमध्ये जीवनाचा प्रवाह आहे; जर तुम्ही याच गोष्टींकडे डोळेझाक केली तर तुम्हाला जीवन काय कळणार? मला वाटतं या पेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट माणसानी दडवली आहे आणि ती म्हणजे न्यूनगंड!
न्यूनगंड म्हणजे रूढ अर्थानी जे समजले जाते ते स्वतःला कमी लेखणे किंवा अपयशी मानणे असे नव्हे, तर तुमची स्वतः विषयी असलेली कल्पना, मग तुम्ही स्वतःला यशस्वी समजता, सर्वोच्य समजता की अपयशी समजता यानी काहीही फरक पडत नाही. तुमची स्वतः विषयीची कल्पना आणि तुमचे स्वरूप यातली तफावत हे जीवनातल्या तणावाचं मुख्य कारण आहे आणि तेच आपण दडवून ठेवलयं!
तुम्ही बघा कोणीही स्वतःला न्यूनगंड आहे असे मानत नाही तर प्रत्येक जण आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण असा आत्मविश्वास दाखवणारा माणूसच जगात यशस्वी होताना दिसतो. स्वतःला अयशस्वी समजणारा माणूस खंतावलेला असतो पण तो अशा आत्मविश्वास दाखवणाऱ्याशी एकतर स्वतःला जोडून तरी देतो किंवा त्यानी यशस्वी होण्यासाठी काय केले हे बघून स्वतःच्या जीवनाची दिशा ठरवत असतो. थोडक्यात काय तर आपण अस्वस्थ आहोत हे मानायला कुणीच तयार नसतो याला मी न्यूनगंड लपवणे म्हणतो.
वास्तविकतः न्यूनगंड किंवा हे मानसिक अस्वास्थ्य ही, स्वरूप न कळल्यामुळे अतिशय ओघानी आणि स्वाभाविकपणे झालेली प्रत्येकाची मनोदशा असते आणि विधायकपणे पाहिले तर तीच तुमची तुम्हाला स्वतःप्रत नेणारी ओढ असते पण ती दडवल्यामुळे अस्वास्थ्य वाढत जाते आणि मग पेच काही केल्या सुटत नाही.
हा न्यूनगंड, ही अस्वस्थता, अध्यात्माची सुरुवात आहे आणि त्याचे निराकरण ही अध्यात्माची फलश्रुती आहे.
स्वतःचे स्वरूप गवसण्याला बुद्धाने म्हणूनच 'अल्टिमेट अन्फोल्डमेंट ऑफ सेल्फ' असं म्हंटलं आहे. म्हणजे आता दडवण्यासारखे काहीही राहिले नाही!
माणूस ही अस्वस्थता दडवण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत असतो आणि त्याचा सगळ्यात जवळचा आधार कार्यमग्नता हा असतो. गरज असो वा नसो सतत काही तरी करत राहणे! यात अर्थप्राप्ती हे प्रमुख आणि समाजमान्य व्यवधान असले तरी सतत टि व्ही बघणे, नेट सर्फिंग, चॅटिंग, निष्कारण माहिती गोळा करणे, अत्यंत दूरच्या आणि झंझावाती सहली काढणे, हालापेष्टानी ग्रस्त अशा परिक्रमा करणे यापासून ते वरवर निरूपद्रवी वाटणारे पण सतत गुंतवून ठेवणारे नामस्मरण किंवा जप करणे असे अनेक प्रकार येतात.
याचे समीकरण असे आहे की जेवढी अस्वस्थता अधिक तेवढे ध्येय भव्य! याचे (थोडेसे लांबचे वाटेल पण) आगदी उघड उदाहरण म्हणजे हिटलर, स्वतःची अस्वस्थता दडवण्यासाठी त्यानी सगळ्या जगाला कामाला लावलं. अर्थात जो पर्यंत हे लोक यशाच्या शिखरावर असतात तोपर्यंत यांच्या विरूद्ध ब्र काढण्याची कुणाची हिम्मत नसते एवढच नाही तर आपल्या हातून असे काही तरी संस्मरणिय व्हायला हवे होते अशी मनोमन खंतही सगळ्याना वाटत असते. एकदा का यांचा बहर ओसरला की यांनी केलेल्या नुकसानाची कल्पना येते पण माणूस शिकत नाही तो नवीन रोल मॉडेल शोधायला लागतो!
या सततच्या अस्वास्थ्याची परिणीती आत्महत्येत होते. सध्या हा विषय जोरदार चर्चेत आहे पण जो पर्यंत या अस्वास्थ्याची चर्चा होत नाही तो पर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. हिटलर पासून ते मायकेल जॅक्सन पर्यंत एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे हे अस्वास्थ्य! या अस्वास्थ्याला एकहार्ट 'द बॅकग्राउंड स्कोअर ऑफ लाईफ' म्हणतो (द न्यू अर्थ). स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवणे हीच एक नामी शक्कल माणसाने या अस्वास्थ्याला वाट मोकळी करून देण्यासाठी निवडली आहे पण जरा का उसंत मिळाली की परत हे अस्वास्थ्य जाणिवेत प्रवेश करू लागते. त्यामुळे शेक्स्पिअरनि जीवनाला : ' अ फ्युटाइल स्टोरी ऑफ फ्युरी अँड ककॉफनी कंटेनिंग नथींग' असे म्हंटले आहे.
आत्महत्या सोडता या अस्वास्थ्याचे निकडीने निराकारण करायची गरज फक्त दोनच परिस्थितीत वाटू शकते: एक : अत्यंत संपन्न अवस्था आल्यावर किंवा दोन : अत्यंत बिकट परिस्थितीत सापडल्यावर; आणि तुमचे स्वतःवर प्रेम असेल तर इथेच अध्यात्माची सुरुवात होते! सामान्यतः माणसाला अध्यात्माची गरज न वाटण्याचे कारण म्हणजे त्याच्या जीवनात अशी परिस्थीती उद्भवली नसते हे आहे.
अत्यंत संपन्न माणसाच्या लक्षात येते की जीवन ही पुनरावृत्ती आहे आणि त्याची परिणीती मृत्युत होणार आहे मग तो अत्यंत निकडीनी पेच सोडवायला लागतो, हे बुद्धाच्या जीवनात अंत्ययात्रा पाहून घडलं. दुसरी गोष्ट अर्जुनाच्या जीवनात घडली, प्रसंग इतका बिकट की जिंकलो तरी हार आणि हरलो तर मृत्यु!
या अस्वस्थतेवर एकमेव उपाय म्हणजे आपण स्वतः विषयी केलेल्या कल्पनेचं निराकरण हा आहे. आपण आकार नसून निराकार आहोत हे कळता क्षणी तुम्ही प्रसंगा बाहेर होता मग तो प्रसंग कोणताही असो! तुमच्या लक्षात येतं की प्रसंग आहे पण आपण, प्रसंग ज्यात घडतो आहे त्याच्या आत-बाहेर असलेली जागा आहोत, ज्याच्यावर प्रसंग बेतला आहे ती व्यक्ती नाही; तुम्ही गर्तेतून बाहेर येता! त्यामुळे अध्यात्मात जीवनाला भवसागर म्हंटले आहे, तुम्ही जो पर्यंत स्वतःला व्यक्ती समजता तोपर्यंत तुम्ही कोणीही असा तुमची नांव गर्तेत आहे आणि ज्या क्षणी तुम्हाला निराकाराचा बोध होतो त्या क्षणी तुम्ही सागर होता, तुम्ही भवसागर पार करून जाता, सारी अस्वस्थता दूर होते, हे जीवन उत्सव होते.
"तुम्ही आता ईशावास्य उपनिषदातला हा श्लोक बघा, म्हणजे तुम्हाला ते उपनिषद लिहीणाऱ्या ऋषीच्या बुद्धीमत्तेची कमाल लक्षात येईल. या श्लोकाच्या नुस्त्या उच्चारणाने सारा न्यूनगंड दूर होतो, तुम्ही व्यक्तीमत्वातून मोकळे होता आणि निराकाराच्या पूर्णतेशी संलग्न होऊन शांत होता. काय कमालीचा श्लोक आहे बघा:
पूर्णं इदं (म्हणजे निराकार पूर्ण आहे), पूर्णं अदाः (मी देखील, स्वतःला देह समजत असलो तरी, पूर्ण आहे), पूर्णात पूर्ण उदिच्चते (कारण पूर्णातून पूर्णच निर्माण होते)
पूर्णात पूर्ण अदायस्य (म्हणजे तुम्ही पूर्णात जेंव्हा, देह म्हणून जरी, विलीन झालात), पूर्णं-एव-अवशिश्यते (तरी पूर्ण हे पूर्णच राहते)
ॐ शांतिः शांतिः शांतिः

२७. पैसा

श्वासात अडकला पैसा,पैशात अडकला श्वास;श्वासाने सार्थक पैसा कीपैशाने चाले श्वास?
स्वच्छंद जगायला नक्की किती पैसा लागतो हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकानं मला विचारला आहे. स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा अशी प्रत्येकाची मनोमन धारणा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही.
मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जे मी लिहितोय तो माझा अनुभव आहे आणि तुम्हाला स्वच्छंद जगायचं असेल तर जे लिहिलंय त्याचा जीवनात प्रयोग करून बघायला हवा.
तुमच्या कोणत्याही प्रश्नाला माझ्याकडे आचरणात आणता येईल असं उत्तर आहे पण इथे उलटसुलट चर्चा करून उपयोग होणार नाही, तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष उपयोगी ठरतील. म्हणजे पोहणं चर्चा करून येत नाही, चर्चेतून प्रक्रिया कळू शकेल पण शेवटी पाण्यात उतरायला हवं तसा हा विषय आहे.
तर पहिली गोष्ट, स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे एक कारण आहे ते असं की प्रत्येकानं स्वतःकडे असलेल्या पैशाचं ‘रेव्हेन्यू आणि कॅपिटल’ असं विभाजन केलं आहे. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित!
कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका ‘भांडवली पैसा’ हवा की त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी! मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम कमालीची लॉटरी वगैरे लागायला लागते रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्म असंच चालू राहील!
मग काय करायला हवं? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं (आणि ती वस्तुस्थिती आहे), त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं.
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार घटना आपसूक घडतात त्या अशा:
एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा ‘वापरणं’ म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.
तीन, तुमच्या वागण्यात एक बिनधास्तपणा सहजच येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात सक्रिय न होऊ देता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात यायला लागतं. पैसा ही कल्पना आहे, आपण सार्थक आहोत, आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.
पैसा ही मुळात कल्पना आहे पण कोणतीही कल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर ती वस्तुस्थिती वाटायला लागते. अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही.
इथे मला अजून एक गैरसमज दूर करावा असं वाटतं, प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झाली आहे. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे.
हा गैरसमज दूर झाल्यावर पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते!
मी जे म्हणतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा आपसूक बदलेल. तुमच्या दिवसाची सुरुवात, तुमच्या जीवनाची दिशा पैसा न राहता आनंद होऊ शकेल. जीवनाची आणि निर्णयाची दिशा आनंद होणं हा जगणं मजेचं होण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा जगणं मजेचं झालं की धाडस वाढतं, जसजसं धाडस वाढतं तसतसं जगणं मजेचं होतं!
एक दिवस तुम्ही ही माझ्यासारखी जीवनाची प्रायॉरिटी पूर्णपणे बदलू शकाल, तीस सप्टेंबर ही इन्कमटॅक्स रिटर्न्स भरायची अंतिम तारीख असताना जे कोणताही सी ए करू शकत नाही ते तुम्ही करू शकाल, केवळ मजा वाटते म्हणून इथे लिहू शकाल!
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी त्याला म्हणालो अरे असं जगून बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भीतीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत!

३४. जागृती

झोप ही मोठी गमतीशीर प्रक्रिया आहे. झोपेची आध्यात्मिक उकल हा अनेक रंगी अध्यात्माच्या एक अनोखा रंग आहे.
सत्य समजलेल्या व्यक्तीला ‘जागृत पुरुष’ म्हणतात कारण त्याला झोपेच्या या पैलूचा उलगडा झालेला असतो. झोप हा अध्यात्माचा एकदम काव्यात्मक पैलू आहे. आज झोपे विषयी लिहावंस वाटतंय.
अस्तित्वाची एकरूपता ही ऑरगॅनिक युनिटी आहे. मेकॅनिकल युनिटी आणि ऑरगॅनिक युनीटीमध्ये फरक आहे. कार ही मेकॅनिकल युनिटी आहे पण शरीर ही ऑरगॅनिक युनिटी आहे. ऑरगॅनिक युनीटीत सगळे पार्टस् जरी मेकॅनिकल युनिटी सारखे एकमेकाशी निगडित असले तरी ते एकाच मूलद्रव्या पासून बनलेले असतात. मेकॅनिकल युनीटीत तशी अशी अट नाही. शरीर ही ऑरगॅनिक युनिटी आहे कारण सगळं शरीर हे अन्न या एकाच मूलद्रव्याचं रूपांतरण आहे.
आता अस्तित्व ही ऑरगॅनिक युनिटी आहे म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलं असेल. अस्तित्वातलं सगळं प्रकटीकरण जाणीव या एका मूलद्रव्याचं रूपांतरण आहे. जाणीवेलाच निराकार किंवा शून्य असंही म्हटलंय.
इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर पुढे मजा आहे. झोप ही जाणीव या अस्तित्वाच्या मूलतत्त्वाला रूपांतरित करणारी प्रक्रिया आहे. सगळ्या प्रकट जगाच्या निर्मितीच कारण झोप आहे!
अगदी सरळ सरळ सांगायचं झालं तर माणूस ही जाणीवेला आलेली जाग आहे आणि दगड ही जाणीवेच्या झोपेची अंतिम अवस्था आहे. देवाच्या मूर्ती दगडाच्या बनवण्याचं कारण टिकाऊपणा नसून प्रतिकात्मकता आहे. दगड हे निम्नतम रूप, माणूस ही मधली अवस्था आणि सिद्ध पुरुष ही जाणीवेची अंतिम अवस्था असा क्रम आहे. जागृत पुरुष हे जाणीवेचं अंतिम रूप आहे. संपूर्ण जागी झालेली जाणीव म्हणजे अनंत मोकळं आकाश, मुक्तता, अनंतता आणि गाढ झोपलेली जाणीव म्हणजे दगड!
जाणीवेच्या रूपांतरणाची प्रक्रिया अत्यंत लोभस आहे. जाणीवेचं रूपांतरण म्हणजे शून्याचा आकार होणं, निराकाराचा आकार होणं! काही नाही त्यांनी रूप धरण करणं! अस्तित्वाला त्यामुळे रहस्य म्हटलंय आणि जादूचं माणसाला खोल कुठे तरी आकर्षण आहे. हे अस्तित्व जादूमय आहे!
या जादूगिरीला आणखी एक रम्य पैलू आहे, जाणीव या रूपांतरणात जशीच्या तशी राहते! जाणीव रूप धारण करते पण स्वतः निराकारच राहते. ते आरशा सारखं आहे, आरसा छबी धरण करतो पण स्वतः जसाचा तसा राहतो. झेन संप्रदायात जाणीवेला आरशाची उपमा दिलीय.
रोजची झोप हे जाणीवेचं नेणीवेत रुपांतर आहे म्हणजे आपण कळण्याकडून न कळण्याकडे जातो. आपण बिछान्यावर आहोत, डोळे मिटलेत, सगळं ऐकू येतंय, जाणवतंय, विचारांची मालिका हळूहळू इल्लॉजिकल होते आणि मग एकदम काही कळेनासं होतं. या कळण्याच्या क्षमतेचं न कळण्यात रुपांतर झालं तरी जाणीव, म्हणजे थोडक्यात आपण, जसेच्या तसे राहतो कारण जाणीव कधीही स्वभाव बदलत नाही. त्यामुळे कितीही गाढ झोप लागली आणि काहीही कळेनासं झालं तरी झोप उघडल्यावर आपल्याला गाढ झोप लागली होती आणि काहीही कळत नव्हतं हे कळतंच!
जागृत पुरुषात आणि इतरे जनात फक्त इतकाच फरक असतो, या कळण्याकडून न कळण्याच्या प्रदेशात जाताना तो स्वतःला विसरत नाही, तो या रूपांतरणात जसाच्या तसा राहतो. सामान्य माणूस सांसारिक विवंचनांनी इतका दमलेला असतो की तो स्वतःला विसरून जातो आणि त्याला आपण आहोत ही आठवण जाग आल्यावर येते.
कधी तरी हा प्रयोग करून पाहा ‘मी आहे’ हे भान झोपताना कायम ठेवायचा प्रयत्न करा, स्वतःला विसरू नका, एक दिवस असा येईल की झोप तुम्हाला कळण्याच्या क्षेत्रातून न कळण्याच्या क्षेत्राकडे नेऊ शकणार नाही. तुम्ही सदैव कळण्याच्या क्षेत्रातच राहाल, शरीर झोपेल पण तुम्ही जागे असाल!
या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमीचा असा अर्थ आहे.