Monday, December 06, 2010

५. संसार, संन्यास, कर्मयोग, भक्तीयोग

अध्यात्मात ज्यांना समजले नाही त्यांनी अनेक प्रकारचा गोंधळ घालून ठेवला आहे, असा गोंधळ मनातून दूर झाल्याशिवाय सहज आणि सोपा असलेला निराकार गवसत नाही.

अध्यात्म हे युगानुयुगे संसार विरोधी मानले गेले आहे. शाश्वताच्या शोधात निघालेल्याने क्षणभंगुराचा त्याग केला पाहिजे ही कल्पना जनसामान्यात अत्यंत रूढ झालेली आहे. पु. लं. नि सुद्धा विनोदाने 'द्राक्षही नाही आणि रुद्राक्ष ही नाही' अशी आध्यात्मिक अपयशाची खिल्ली उडवली आहे, त्यामुळे आध्यात्मिक नेहमी दोलायमान स्थितीत दिसतो आणि अध्यात्म जीवन विरोधी आहे असे वाटते. पण वस्तुतः ते तसे नाही. आकार आणि निराकार मिळून अस्तित्व झाले आहे, अस्तित्वात कोणताही अंतर्विरोध नाही. सगळा अंतर्विरोध न कळलेल्यांच्या मनात आहे.

संन्यास ही सर्वात चुकीची कल्पना या गैरसमजातून निर्माण झालेली आहे. वास्तविक संन्यासाचा अर्थ सम-न्यास म्हणजे श्वास मोकळा होणे (सम होणे) इतका साधा आहे. तुम्ही जेव्हा निराकाराला जाणता तेव्हा तुम्ही निश्चिंत होता आणि तुमचा श्वास मोकळा आणि एकसारखा होतो. संन्यास म्हणजे घरदार सोडून षड्रिपूंशी सामना करायला अरण्यात किंवा कुठल्याश्या आश्रमात निघून जाणे, तासन्तास ध्यान लावून बसणे, शरीराची हेळसांड करणे नाही. यातून विषाद शिवाय काहीही मिळत नाही. बुद्धाला शून्याचा उलगडा झाल्यावर तो राजनगरीत परत आला. यशोधरा त्याला म्हणाली तुम्ही सत्य शोधायला गेला होतात तर मग आम्हाला न सांगता, अशी अपरात्री सोडून जाण्याची काय आवश्यकता होती? ती पुढे जे म्हणाली त्यांनी बुद्ध देखील निरुत्तर झाला, ती म्हणाली की तुम्ही म्हणता तसे सत्य जर सर्वत्र आहे तर ते इथे गवसले नसते का? आणि हीच खरी निराकाराला शोधण्यातली मौज आहे, संसारात राहून शोधले तर ते खरे सत्य नाही तर आश्रमातल्या शांततेचा घरी आल्यावर कसा टिकाव लागणार? निराकाराची शांतता इथे काय आणि हिमालयात काय सारखीच आहे.

भक्तियोग आणि सांख्ययोग (किंवा ज्ञानयोग) यात फरक आहे. ते दोन विरुद्ध मार्ग आहेत. ज्ञानयोगात मुळात ऐक असलेल्या निराकाराला सरळ जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तर भक्तियोग आधी साधकाला ऐक आकार कल्पायला सांगतो, या आकाराला देव अशी संज्ञा दिली जाते. त्यामुळे प्रत्येकाचा देव वेगळा असू शकतो. अश्या संकल्पनेचा मूळ उद्देश मन ऐका आकारावर केंद्रित करणे हा असतो. यामुळे मनातले असंख्य विचार जाऊन साधक ऐका कल्पनेवर लक्ष्य केंद्रित करू शकतो. पण कोणतीही कल्पना सुरुवातीला विचार या स्वरूपात असल्यामुळे साधकाला या विचाराचा आकार करणे फार जिकिरीचे होते. असे बघा ताजमहाल बांधावा असा शहाजहानच्या मनात प्रथम विचार येतो. त्या विचाराचे हळूहळू कल्पनेत रुपांतर होते, मग त्याला कल्पनेतला ताजमहाल दिसू लागतो. मग तो ती संकल्पना वास्तुविशारदांच्या मदतीने कागदावर आणतो आणि मग यथावकाश ताजमहाल निर्माण होतो. साधकाला अश्याच प्रकारे विचाराचे कल्पनेत आणि कल्पनेचे त्याच्या मनासमोर दिसेल असे रूप तयार करायचे असते. हे ऐकतर जिकिरीचे असते आणि त्यातून देव दिसल्यावर (किंवा भेटल्यावर) तुझे सगळे प्रश्न सुटतील अशी त्याला समजूत करून दिलेली असते त्यामुळे मनाला (भासात्मक का होईना) काल्पनिक देव दिसला की त्याला सगळे काम झाले असे वाटते. वास्तविक ह्या मनाच्या एकाग्रतेमुळे निर्माण झालेल्या काल्पनिक आकाराला सोडता क्षणी मनाचा सगळा गोंधळ संपून त्याला निराकार दिसणार असतो पण साधक इतक्या प्रयासाने तयार केलेला आकार सोडायला जाम तयार होत नाही. त्यात त्याला आता आपल्या कल्पनेतला आकारच आपले सगळे प्रश्न सोडवेल अशी खात्री असल्यामुळे प्रकरण फारच गंभीर होते. म्हणून कल्पनेने कल्पनेचे निराकरण ही भक्तियोगाची प्रणाली ऐकतर साधकांना समजत नाही आणि दुसरे म्हणजे कल्पना सोडून देता न आल्यामुळे निराकाराची जाणीव होणे दुरापास्त होते.

कर्मयोगाचा खरा अर्थ क्रियेतून अकर्त्याला शोधणे असा आहे. निराकार हा अकर्ता आहे हे आपण चौथ्या लेखात पाहिले आहे. अकर्त्याला शोधण्यासाठी सूफी पंथाने ऐक प्रक्रिया शोधली आहे. (मी ही पद्धत फक्त सांगतो आहे, तिचा पुरस्कार करत नाही.) तुम्ही कोणताही अडथळा नसलेल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेवर, उपाशी पोटी, स्वतः भोवती फिरण्यास सुरुवात करा. कितीही चक्कर आली तरी फिरत राहा. कितीही तोल जातो वाटला तरी काळजी करू नका. पडलात तरी पुन्हा उठा आणि फिरायला सुरुवात करा. अनेक तासांनी ऐक क्षण असा येईल की तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल, शरीर फिरते आहे आणि आपण स्थिर आहोत हे तुम्हाला जाणवेल. तुम्हाला कळेल की या व्यक्त जगात सगळे हालते आहे पण आपण स्थिर आहोत. तुम्हाला अकर्ता हे निराकाराचे परिमाण गवसेल.

खरं तर इतकं काही करायची आवश्यकता नाही. कोणताही शास्त्रीय गायक, वादक किंवा नर्तक आपल्या सादरीकरणात पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा त्याला असे वाटते की आपण गात, वाजवत किंवा नर्तन करत नाही. तुम्हीही कलाकारांचे या अर्थाचे बोलणे वाचले असेल. त्याला ते नीट सांगता येत नाही पण त्या क्षणी मनाच्या एकाग्रतेमुळे तो शरीरा पासून वेगळा झालेला असतो, अकर्ता झालेला असतो आणि त्यामुळे आपण सादर करणाऱ्यापेक्षा वेगळे आहोत हे त्याला जाणवते. मनाची एकाग्रता संपली की पुन्हा अकर्ता हे निराकाराचे परिमाण अनुपलब्द्ध होते. अश्या प्रकारे कोणत्याही क्रियेत तुम्ही निमग्न होऊन शरीर आणि मनापासून वेगळे होऊ शकता हा कर्मयोगाचा खरा अर्थ आहे.

आता आपण कर्मयोगाची काय अवस्था केली आहे ते बघा. अपेक्षा किंवा फलरहित कर्म या ऐका निरर्थक कल्पनेवर आजपर्यंत किती लिहिले गेले आहे? आणि त्यातून काय साधले आहे? भारतात तर दैवनिहीत कर्म, ईश्वर समर्पित कर्म (फलरहितच्या जोडीला) आणि काय वाट्टेल त्या कल्पनांनी सगळ्यांच्या मनाची द्विधा अवस्था करून टाकली आहे आणि कर्माचा बाजा वाजवला आहे. एकजण धड काम करत असेल तर शपथ असे म्हणायची पाळी आली आहे आणि प्रत्येकाला कधी संपवतो हे काम असे वाटू लागले आहे. काम करावे तरी पंचाईत आणि पैसे मागावे तरी पंचाईत अशी परिस्थिती होऊन बसली आहे. वास्तविक याचा कर्मयोगाशी काहीही संबंध नाही. पण त्यामुळे भारतीय उत्पादनाचा दर्जा जगन्मान्यात पावू शकत नाही. पाश्चिमात्य लोक कसोशीने काम करतात कारण त्यांना कर्मयोग कळला आहे असे नाही तर त्यांच्या मनात गोंधळ नसल्यामुळे तो त्यांना नकळत साधला आहे. तुम्ही मन लावून कोणतेही काम करून बघा तुम्हाला कळेल की शरीर आणि मन काम करते आहे तुम्ही निष्काम आहात. तुम्ही त्या शरीर आणि मनाच्या अवतीभवती असलेली स्पेस (अवकाश) झाला आहात. तुमचे मूळ स्वरूप, निराकार तुम्हाला गवसेल, तुम्हाला पहिल्यांदा कर्माचा आनंद काय असतो ते कळेल.

 
संजय

No comments:

Post a Comment