Monday, December 06, 2010

४. वेळ, अंतर आणि काम

वेळ, अंतर आणि काम या रोजच्या मानवी जीवनात ताण निर्माण करणाऱ्या तीन महत्वाच्या गोष्टी निराकराला जाणल्यावर कश्या सहज होतात ते बघू.

निरकारात वेळ कोठेही नाही. निरकार सनातन आहे. सतत निर्माण होणाऱ्या आकाराकडेच आपले लक्ष्य असल्यामुळे वेळेचा भास होतो. अशी कल्पना करा की तुम्ही पृथ्वी पासून सरळ काही किलोमीटर वर आकाशात गेला आहात. तुम्हाला जाणवेल की पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होत आहेत. अंतराळात वेळ कुठेही नाही. वेळ ही माणसानी उपयोग म्हणून निर्माण केलेली कल्पना आहे. वेळेचा उपयोग निश्चीत आहे पण ती कल्पना आहे. निराकार जाणवण्यासाठी मनात खोल गेलेली वेळेची कल्पना शून्य झाली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही वेळ पाळणार नाही असा नाही. मनावर सतत असलेले वेळेचे दडपण निघून जाईल. वेळ स्वतःपेक्षा महत्त्वाची वाटणार नाही. वेळ ही वस्तुस्थिती नसून कल्पना आहे हे कळल्यावर सारखे घड्याळाकडे बघणे आणि निर्णय घेणे कमी होईल. तुम्हाला हळूहळू अस्तित्वाशी एकतानता साधायला लागेल.

कृष्ण निराकाराला सनातन वर्तमान म्हणतो कारण वर्तमान हा एकच काळ अस्तित्वात आहे. ओशोंची सगळी आध्यात्मिक शिकवण केवळ एका संकल्पनेवर अधारलेली आहे 'नाऊ अँड हिअर', कृष्णमूर्ती म्हणतात : 'नाऊ इज द अल्टिमेट सिक्युरिटी', एकहार्ट ची अध्यात्मिक ओळखच जगाला त्याच्या 'पॉवर ऑफ नाऊ' मुळे झाली. तुम्ही जे काय करणार, आठवणार, योजणार ते फक्त एका क्षणात होऊ शकत आणि तो म्हणजे ' हा क्षण '. मागे जे घडले ते आठवायचे असेल तरी हाच क्षण, पुढचे ठरवायचे असेल तरी हाच क्षण आणि काही करायचे असेल तरी हाच क्षण.

मनातली वेळ ही संकल्पना गेली की तुम्हाला कळेल आपल्याला वय नाही. शरीर जुने होईल पण आपण नाही. आपण सदैव तसेच रहातो. वेळेचे दडपण गेल्यामुळे तुमच्या जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण होईल. हा आनंद आणि उत्साह तुम्ही कालरहित निराकाराशी जोडला गेल्यामुळे येतो.

निराकार एकसंध आहे. निराकार कुठे आहे हे स्थान म्हणून दर्शवता येत नाही कारण निराकार अमुक ठिकाणी आहे आणि तमुक ठिकाणी नाही असे नाही, ते सर्वत्र आहे. निरकारात अंतर नाही. यामुळे निरकाराचा दुसरा अत्यंत लोभस पैलू तयार होतो, ते कुठेही जात- येत नाही, ते अचल आहे. ज्या क्षणी अंतरही कल्पना तुमच्या मनातून दूर होते त्या क्षणी तुमच्या लक्ष्यात येते की आपण ही हलत नाही. शरीर हलते, विचार हलतात, आपण स्थिर आहोत. शरीर आणि मन या पासून आपलं असलेलं वेगळेपण तुम्हाला जाणवतं. कुठेही असलात तरी तुम्ही असल्या जागी स्थिर होता. कुठेही निघालात तरी एक न हलणारा घटक तुमची कायम साथ करतो. तुमच्या हालचालीत एक स्वस्थता येते. तुमच्या बोलण्यात, विचारात एक लयब्द्धता येते. तुम्ही कोणत्याही प्रसंगात असाल तरी थोडेसे त्या प्रसंगा बाहेर रहता. अचल निरकाराशी तुमचा दुवा जुळल्याचा तो परिणाम असतो.

निरकाराला अकर्ता म्हंटले आहे. त्याच्या शिवाय काही घडू शकत नाही पण तो स्वतः काही करत नाही. तो चित्रपटाच्या पडद्या सारखा आहे, तो असल्यामुळे चित्रपट दिसतो पण तो स्वतः चित्रपटात काहीही काम करत नाही. बुद्धाची सारी विपश्यना निराकाराच्या या अकर्त्या पैलूला जाणून घेण्याची आहे. तुम्ही थोडे शांत बसलात, थोडे निश्चींत झालात तर तुमच्या लक्ष्यात येईल की जीवन आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती बुद्धीमान आहोत, आपण किती महान कार्य करतो आहोत, आपल्याला किती समाज मान्यता आहे या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही ते आपल्या नकळत चाललेल्या आपल्या श्वासावर अवलंबून आहे. तुम्हाला त्या क्षणी कळेल की इतकी महत्वाची गोष्ट आपण फक्त जाणू शकतो करू काहीही शकत नाही. ज्या क्षणी तुम्हाला या महिती आहे असे वाटणाऱ्या पण क्वचित जाणवणाऱ्या गोष्टीची जाणिव होईल तेंव्हा तुम्हाला कळेल की आपण अकर्ता आहोत. पहिल्यांदा तुमच्या जीवनात 'लेट गो' येईल, घटना घडवण्याच्या अट्टहासाचा सगळा ताण जाऊन तुम्ही घटना घडू देऊ लगाल. रोजचे कंटाळवाणे वाटणारे काम एक नवीन परिमाण घेईल. हा अकर्ता जर तुम्हाला गवसला तर तुम्हाला कळेल आपण कधीच काही केले नाही, जे घडले ते शरीर आणि मनाच्या स्तरावर होते, आपण सिनेमाच्या पडद्या सारखे तिथे फक्त उपस्थित होतो. तुमचे काम तुम्हाला मजेचे वाटायला लागेल. तुमच्या जीवनाची दिशा घडवण्या ऐवजी घडू देण्याकडे बदलेल. तुम्ही निश्चींत होऊ लागाल.
 
संजय

No comments:

Post a Comment