Monday, December 06, 2010

३. चमत्कार, रहस्य आणि ध्यान

अस्तित्वातल्या कोणत्याही घटनेचा मागोवा घेऊन तिचा कार्य-कारण भाव बुद्धीने शोधला जाऊ शकतो पण एका ठराविक मर्यादे नंतर बुद्धी उत्तर शोधू शकत नाही तिथे रहस्य सुरू होते. सफरचंद खाली का पडते याचा उलगडा न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून केला पण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? हे त्याला सांगता आले नाही आणि ते कोणालाही सांगता येणार नाही कारण ते रहस्य आहे.

ह्या अस्तित्वाची निर्मिती कशी झाली याला एकमेव आणि अत्यंत अलौकिक उत्तर अष्टावक्रानी आपल्या गीतेत दिले आहे. तो म्हणतो ह्याची सुरुवात झालेली नाही हे सुरुवाती पासून असेच आहे.

निराकार आणि आकार हे अस्तित्वाचे स्वरूप कालात सुरू झालेले नाही ते सुरुवाती पासूनच तसे आहे आणि म्हणून त्याच्या मागे जाता येत नाही, ते एक रहस्य आहे.

इतक्या सोप्या आणि सुरेख रहस्याचा जे जगायला आणि उपभोगायला आता या क्षणी उपलब्ध आहे, माणसाने चमत्काराचा ध्यास घेऊन आणि काल्पनिक कथा रचून पूर्णपणे बाजा वाजवला आहे.

सिद्धी आणि चमत्कार यांनी माणसाच्या मनाचा इतका आध्यात्मिक गोंधळ उडवून दिला आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे आपल्या निराकार स्वरूपाचा बोध होणे जवळ जवळ दुरापास्त झाले आहे.

अमक्याने स्वतःचा देह सरळ आकाशात नेला, तमक्याला पाण्यावरून चालत इकडून तिकडे जाता आले, कुणी इथे बसून पृथ्वीच्या त्या टोकाला काय चालले असेल ते सांगितले, एक ना अनेक पण या सगळ्या काल्पनिक कथा आहेत. समजा एकाला पाण्यावरून सरळ चालत जाता आले तर त्या घटनेचा मागोवा घेऊन पुन्हा ती घटना तशीच घडवता येईल, त्याचा कार्य-कारण भाव शोधता येईल. पण चमत्कार आणि निराकाराचा बोध याचा काहीही संबंध नाही. निराकाराच्या बोधाने तुमच्या जीवनात स्वास्थ्य येईल, तुम्हाला कोणताही चमत्कार करता येणार नाही.

चमत्कार ही हातचलाखी आहे. त्यामुळे मला चमत्कार करता येत नाही म्हणजे मला सत्याचा बोध झाला नाही हा गैरसमज मनातून दूर करा. निसर्गदत्त महाराजानी, ज्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज त्यांच्या 'सुखसंवाद' वरून येऊ शकतो, कोणताही चमत्कार केला नाही. ओशो म्हणाले ' मी कोणताही चमत्कार करत नाही हा एकच चमत्कार करतो. एकहार्ट सारखा दिग्गज इतका साधा आहे की तुम्ही त्याचे 'पॉवर ऑफ नाऊ', 'स्टिलनेस स्पिक्स' किंवा 'न्यू अर्थ' वाचत नाही तोपर्यंत त्याच्या बुद्धिमत्तेची कल्पना देखील येणार नाही, कृष्णमूर्ती ज्यांनी अध्यात्माला नवं परिमाण दिलं काहीही चमत्कार केला नाही.

अस्तित्व हे रहस्य आहे, काव्य आहे, त्या रहस्यात मशगुल होणे, त्या रहस्याप्रती कृतज्ञ होणे हा जगण्याचा सोपा मार्ग आहे. आकार आणि निराकार या एकसंधतेशी आपली मुळात असलेली एकरूपात जाणण्याचा ह्या रहस्यात जगणे हा उपाय आहे. हे अस्तित्व स्वतःच ऐक चमत्कार आहे, निराकाराने कुठेही स्पर्श न करता आकार सांभाळला आहे हाच खरा चमत्कार आहे.

सांख्य योगात ध्यानाला खरं तर स्थान नाही. अष्टावक्र आपल्या गीतेत म्हणतात : ' मुक्तीसाठी अनुष्ठान करणे हेच बंधन आहे' कारण वियोग झालेलाच नाही. तरीही अगदी सहज हाताशी असलेली आणि सांख्याला अनुरूप आशी ध्यान पद्धत बघू.

ध्यानाचा साधा अर्थ 'लक्ष्य' असा आहे. हिंदीत ज्या अर्थाने 'आपका ध्यान किधर है? ' म्हणतात, तो ध्यानाचा खरा अर्थ आहे. मी सुरुवातीला म्हटले तसे व्यक्तिमत्त्व हा निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा आहे. ह्या व्यक्तिमत्त्वाची सुरुवात मुलाचे लक्ष्य पहिल्यांदा जेंव्हा वेधले जाते तेव्हा पासून होते. लक्ष्य वेधल्यामुळे निराकार जाणीवेला दिशा निर्माण होते आणि मुलाचे लक्ष्य बहिर्गामी होते. निराकाराला स्वतःचा विसर पडतो. हेच लक्ष्य (ध्यान) परत निराकाराकडे वळवले की निराकाराचा बोध होतो. या साठी फक्त ऐकच करा समोर बघा, बस्स! तुम्ही कुठल्याही प्रसंगात असाल, काहीही अडचण असेल तर फक्त समोर बघा! ऐका क्षणात तुमचे ध्यान परत तुमच्याकडे येईल. व्यक्तिमत्त्व हे मनोनिर्मीत असल्यामुळे ज्या क्षणी तुम्ही समोर बघता त्या क्षणी तुम्ही वास्तवात येता. तुमचे लक्ष्य खरे तर मनानेच वेधून घेतलेले असते. मन म्हणजे सतत डोळ्यासमोर आणि काना मध्ये चालू असलेला घटनांचा ऑडियो-व्हिजुअल आहे. तुमचे लक्ष्य त्याच्या पासून निघाले की ते निराकारावर स्थिरावते. कोणत्याही प्रसंगात तुम्ही शांत राहू शकता.

कृष्णमूर्ती या घटनेला 'दॅट विच इज' म्हणतात. ओशो 'नाऊ ऍंड हिअर' म्हणतात, कृष्ण या स्थितीला 'सनातन वर्तमान' म्हणतो, बुद्ध या घटनेला 'क्षणस्थ' होणे म्हणतो. तुम्ही निराकाराशी परत जोडले जाता, किंवा जो वियोग केवळ आपले लक्ष्य (ध्यान) नसल्यामुळे झाला असे वाटत होते तो कधीही झाला नव्हता हे तुमच्या लक्ष्यात येते.

झेन पंथात साधकाला वर्षानुवर्षे भिंतीकडे चेहरा करून बसायला सांगितले जाते. एका क्षणी डोळ्यासमोरून चाललेला मनोचित्रपट त्याला दिसतो, मनाची लक्ष्य वेधून घेणारी बडबड थांबते आणि त्याला समोर कायम हजर असलेला निराकार दिसू लागतो. तुम्हाला भिंती समोर बसायची गरज नाही फक्त समोर बघायची सवय करा निराकार सदैव हजर आहे.

एकदा तुम्हाला निराकाराशी जोडलं जाण्याची ही सोपी पद्धत जमू लागली की तुम्हाला सगळीकडे निराकारच दिसू लागेल. ज्याला गुर्जिएफ 'गेस्टाल्ट चेंज' म्हणतो त्याची तुम्हाला प्रचिती येईल. तुमचे लक्ष्य चित्राकडून पडद्याकडे जाईल. जोपर्यंत पडदा दिसत नाही तो पर्यंतच चित्रपट खरा वाटतो, ज्या क्षणी पडदा दिसतो त्या क्षणी चित्रपटाचा परिणाम शून्य होतो. तुम्हाला शाश्वताची प्रचिती येईल. तुमच्या जीवनात शांतता येईल.
 

संजय

No comments:

Post a Comment